Advertisement
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील अनेक मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुका आहेत, असं मानलं जातं. कारण या निवडणुकांच्या आलेल्या निकालावरुन पुढच्या विधानसभा निवडणुकांचा कल ओळखता येतो. महाराष्ट्राचा नेमका मुड काय आहे, नागरिकांना नेमकं कुणाचं सरकार हवं आहे, याचा काहीसा अंदाज त्यावरुन बांधला जातो. याशिवाय या निवडणुकीत विजय मिळवला तर राजकीय पक्षांना विधानसभेसाठी रणनीती आखण्यास सोयीस्कर जातं, असं मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. या दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारने मविआला धक्का देणारा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने विविध महापालिकांसाठी तयार केलेली नवीन प्रभाग रचनाच थेट रद्द केली आहे. याउलट 2017 मध्ये जी प्रभागरचना होती तीच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयामुळे प्रशासनाचं काम वाढणार आहे. तसेच प्रत्येक महापालिकांमध्ये प्रभागांचा मोठा फरक पडणार आहे. तसेच त्या त्या भागातील राजकीय गणितं देखील बदलणार आहेत.
