Advertisement
नवी दिल्ली : शिवसेना कुणाची हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपावल्यानंतर आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील मूळ याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे, जर या 16 आमदारांचं निलंबन झालं तर सरकार कोसळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरू होतं, तेव्हा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदेंसोबत असलेल्या 16 आमदारांना पक्षांतरबंदी कायदा आणि पक्षविरोधी कारवायांबाबत नोटीस धाडली. या नोटीसला दोनच दिवसांमध्ये उत्तर देण्याची वेळ आमदारांना देण्यात आली. या नोटीसविरोधात या 16 आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यामुळे त्यांना आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असं सांगत शिंदे गटाने जुन्या खटल्यांचे संदर्भ दिले. विधानसभा उपाध्यक्षांनी मात्र दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव हा नोंदणीकृत ई-मेलवरून आला नव्हता, त्यामुळे तो फेटाळण्यात आल्याचा युक्तीवाद कोर्टात केला.
