Advertisement
मुंबई : वेदांता फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. टाटा-एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे, तर हा प्रकल्प महाविकासआघाडी सरकार असतानाच महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.
'कालपासून तीन गोष्टी समोर आल्या. उपमुख्यमंत्री हा प्रकल्प राज्यात कायम ठेवण्यासाठी अपुरे पडले हे मंत्री सांगत आहेत. महाविकासआघाडीला हे एका वर्षापूर्वी माहिती होतं, हे सांगणारी एकच व्यक्ती आहे. 3 वेगवेगळ्या उत्तरांचा अर्थ त्यांनी जनतेला स्पष्ट करावा,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 'या सरकारमध्ये दिशाभूल केली जात आहे. कशाचा कशाला पत्ता नाही. हा गंभीर विषय आहे. दुसऱ्या राज्यात 3 प्रकल्प जाण्याचं कारण काय? महाराष्ट्रातील जनतेला रोजगार नकोय का? हे ईडी सरकारने स्पष्ट करावं,' असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
