Advertisement
मुंबई : राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींची प्रभाग रचना नव्याने होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश दिले आहेत. जनगणनेनुसार प्रभागांची संख्या आणि रचना निश्चित करून प्रभाग रचनेचं प्रारूप तयार करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी दिले आहेत.
राज्यातील मुदत संपलेल्या आणि नजीकच्या कालावधीमध्ये मुदत संपत असलेल्या सर्व महापालिकांसंदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या प्रभाग रचनांच्या या आदेशामुळे महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रलंबित निवडणुका त्वरित घेण्याची विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टासमोर आहे. यावर 28 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील मिळाला तरी 92 नगरपरिषदांसाठी हा निर्णय लागू होणार नव्हता, त्यामुळे राज्य सरकारने या 92 नगरपरिषदांसाठीही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, अशा मागणीची पुनर्विलोकन याचिका दाखल केली. 2021 साली महाविकासआघाडी सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेमध्ये आणि सदस्य संख्येमध्ये वाढ केली गेली, पण राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी ही प्रभाग रचना रद्द केली.
