Advertisement
मुंबई : महाराष्ट्रच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी "महाराष्ट्र केसरी" ही कुस्ती स्पर्धा काही दिवसांपूर्वीच पार पडली. या स्पर्धेत पुण्याचा शिवराज राक्षे हा विजेता ठरला असून त्याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्याचा मान मिळवला. परंतु यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा सध्या वादात अडकली आहे. मातीतली कुस्तीच्या अंतिम सामन्यात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीत सिकंदरवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याच्या वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात सांगलीत कुस्ती होणार असल्याची माहिती मिळत आहे. ही कुस्ती घेण्यासाठी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे. या कुस्त्यांचे आयोजन काही दिवसातच सांगलीत होणार असल्याचे बोलले जात आहे.
