Advertisement
मुंबई | राज्याचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने झाडाझडती सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून भाजप सर्व आमदारांना थेट त्यांचं रिपोर्ट कार्डच देणार आहे. जे आमदार कच्चे आहेत, त्यांची कान उघाडणी केली जाणार आहे. तसेच जे आमदार कच्चे आहेत, त्यांच्या मतदारसंघात पर्याय देण्यावरही भाजपकडून विचार केला जात आहे. त्यामुळे ‘ढ’ आमदारांना भाजपकडून नारळ दिला जाणार असल्याच्या चर्चां आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे आमदार मतदारसंघात जाऊन तेथील नागरिकांची विचारपूस करणार आहेत. मतदारसंघात जाऊन पाहणी करणार आहेत. मात्र, असं असतानाच भाजपने सर्व आमदारांना येत्या 18 ऑगस्ट रोजी मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
