Advertisement
नेमकी काय घोषणा करणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळालं आहे. यानंतर आता लगेच काही महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हं आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या विविध पक्षाच्या नेत्यांकडून विधानसभेच्या जागांबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. जागावाटपाबाबत मविआत कोणतीही चर्चा झालेली नसताना महाविकास आघाडीचे नेते माध्यमांसमोर जागांबाबतची भूमिका मांडून मोकळे होत आहेत. यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध देखील रंगलेलं बघायला मिळालं. यानंतर आता महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
महाविकास आघाडीची उद्या मुंबईत दुपारी दोन वाजता वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असे तीनही महत्त्वाचे नेते पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू असं हे नेते सांगू शकतात. त्याचबरोबर इतर मुद्द्यावर देखील नेतेमंडळी महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
ही पत्रकार परिषद महत्त्वाची राहण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. तीनही पक्षांचे प्रमुख नेते थेट माध्यमांना विविध प्रश्नांवर स्पष्ट उत्तर देणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडीत खरंच बिघाडी आहे का, विधान परिषदेच्या निवडणुकीत काही ठिकाणी ताणले गेलेले संबंध, लोकसभेच्या सांगली जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये झालेले वाद, या विविध घडामोडींवर आता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आता भूमिका काय आहे? ते आता स्पष्ट होणार आहे
