Advertisement
मुंबई : दिल्लीकरांनी भाजपला संधी देत ‘आप’ला नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. मी अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं पण त्यांनी दारुवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे अण्णा हजारे म्हणाले. यानंतर खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारेंवर टीका केली होती. आता या टीकेला अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचे काम अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनी केले. अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती? रामलीला मैदान, जंतर-मंतर रोड कधी पाहिला असता? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहिती झाले, नाही तर ते राळेगणचे दैवत होते. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचे सरकार असेल, त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही, हे दुर्दैवाने सांगायला लागत आहेत. भ्रष्ट सरकारच्या बाजूने ते उभे राहिले. अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद आहे”, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती.
यावर अण्णा हजारेंनी टीका केली. “ज्या रंगाचा चष्मा असतो, त्या रंगाचे जग दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे, त्यामुळे जग दिसणारच तसं, आपण कशाला काय बोलायचं”, असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे.
