Advertisement
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी व्यक्त केले समाधान
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे संस्थेत गेल्या 12 वर्षांपासून मानधनावर काम करणार्या कंत्राटी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यानुसार 46 टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहेत. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मानधन वाढी बाबतचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला आहे, त्या पार्श्ववभूमीवर ऍड. कोमलताई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, कर्मचार्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी आहे. बार्टीमध्ये सुमारे 1200 कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी स्मार्ट सर्विसेस प्रा. लि. या बाह्यस्त्रोत कंपनीमार्फत सफाई कर्मचारी, वाहन चालक, कार्यालय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आस्थापना सहाय्यक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, समतादूत व तालुका समन्वयक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. हे कर्मचारी बार्टीच्या मुख्यालयासह महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, येवला येथील मुक्तिभूमी, नागपूर विभागीय कार्यालय आणि राज्यातील सर्व जिल्हा जात पडताळणी समित्यांमध्ये कार्यरत आहेत. संस्थेमार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि शासनाकडून मिळणार्या 300 कोटी रुपयांच्या वार्षिक निधीचा योग्य विनियोग करणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये या कर्मचार्यांचा मोठा सहभाग आहे, अशा कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ होणे गरजेचे होते, असेही ऍड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी नमुद केले.
