Advertisement
धाराशीव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्ही भाजपा हा पक्ष वगळता कोणाशीही युती करायला तयार आहोत, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाला आता महाविकास आघाडी नेमका कसा प्रतिसाद देते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे पक्षपातळीवर आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा झाल्यानंतर या निवडणुकीबाबत काय भूमिका पुढे येते हे लवकरच स्पष्ट होईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याच निवडणुका लक्षात घेता लातूर तसेच धाराशीव येथे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
वंचित बहुजन आघाडी हा राज्यातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. दलित तसेच इतर बहुजन या पक्षाचे मतदार आहेत. त्यामुळे हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार असून यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या घटकपक्षांच्या रणनीतीत बदल करावे लागतील. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? प्रकाश आंबेडकरांना सकारात्मक प्रतिसाद देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
