Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आक्षेप घेत चक्क त्यांनाच नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काहीही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आक्षेप घेत नोटीस बजावली होती. या नोटीसवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया देत, नोटीसमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याबाबत म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी लावलेली बैठक नियमानुसारच होती. आम्ही तरीही यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ, माहिती घेऊ आणि नंतरच कारवाई करू. पक्षाचे सरचिटणीस सच्चिदानंद यांच्याशी या विषयावर कोणताही संवाद नाही, दिल्लीत कोणाचा झाला असेल तर माहिती नाही. पण, कायदेशीर वैधता तपासावी लागेल, मला वैयक्तिगत वाटत नाही, यात काही तथ्य आहे. एकत्रित बसून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झालेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघपणे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, असेही तटकरेंनी स्पष्ट केले. लोकशाही मार्गाने आम्ही काम करतोय, कोणी कोणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, यंदा वाढदिवसाला अजित दादा नाहीत हे सहन होत नाही, दादांच्या जयंतीनिमित्ताने सप्ताहात विविध कामं, उपक्रम करू, अशी माहिती देखील सुनिल तटकरे यांनी दिली.
सच्चिदानंद यांची नोटीसबाबत काय म्हटले आहे !
सुनेत्रा पवार यांची 26 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड अवैध असून त्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवून राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पक्षाला जाब विचारला आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितलं कि, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीतील त्रुटी दूर होणे गरजेचे आहे. मी कायदेशीर नोटीस पाठवण्यामागे कोणतेही राजकारण नाही. नैसर्गिक न्यायाचा माझा आग्रह आहे.
