Advertisement
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात एकच अडथळा : बीजेपी च्या अटीमुळे मोठा पेच
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई सुरू असताना विलीनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र दोन्ही पक्षातील मतभेदांमुळे विलीनीकरण दुरापास्त झाल्याचं चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास अनुकूल आहे. मात्र हे करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाचे विलीनीकरण करावे लागेल अशी अट घातली आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या तरी थंडावल्या आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर नव्याने चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मोदी भेटीनंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीत शऱद पवारांची भेट घेतल्याने आता फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी असल्याचं बोललं जात होतं. मात्र दोन्ही पक्षांचे नेते हे दावे फेटाळत असून, जाहीर भाष्य करणं टाळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, NDA सोबत यायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाचे विलीनीकरण करावे लागेल अशी अट भाजपाने ठेवल्याची माहिती आहे आणि इथेच पेच निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या नेतृत्वावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचं घोडं अडलं आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्या कारणाने सुप्रिया सुळे त्यांचं नेतृत्व स्वीकारतील का? असा मोठा अडथळा आहे. अजित पवार हयात असताना विलीनीकरण झालं असतं तर त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली जाणार होती आणि सगळे नेते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार होते. मात्र आता नेतृत्व कोण करणार? हा मोठा पेच निर्माण झाला आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या गाठीभेटी
14 जुलै- जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल एकाच वेळी मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर
15 जुलै- जयंत पाटलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
22 जुलै- शरद पवार, सुप्रिया सुळेंकडून पंतप्रधान मोदींची भेट
23 जुलै- पार्थ पवार, प्रफुल पटेलांकडून शरद पवारांची भेट
27 जुलै - सुप्रिया सुळेंकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट
27 जुलै - सुळेंच्या भेटीनंतर तटकरेही शाहांच्या भेटीला
28 जुलै - सुनील तटकरेंना पंतप्रधान मोदींची भेट घेतली
