Advertisement
माजी मंत्री प्रा. लक्ष्णमराव ढोबळे यांची मागणी
सातारा : बहुजन वंचीत समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने कृतीशील आराखडा तातडीने करावा, अशी मागणी माजी मंत्री व बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली आहे.बहुजन रयत परिषदेच्यावतीने प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात नवनिर्धार संवाद अभियान राबविण्यात येत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या या अभियानाबाबत माहिती देण्यासाठी आयेजीत पत्रकार परिषदेत प्रा. ढोबळे बोलत होते. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा कोमल साळुंखे-ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे तसेच सातारचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोबळे म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील प्रश्न जाणून घेतले आहेत. उर्वरित पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत हे अभियान राबविण्यात येत आहे. वाटेगावचे दर्शन घेऊन चिरागनगरीच्या पायावर माथा टेकून आम्ही जनजागरणाचे अभियान सातारच्या ऐतिहासिक भूमीत राबवित आहोत. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. विकासापासून दूर असलेल्या मातंग, मोची, होलार, चांभार, ढोर व धनगर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कृतीशील आराखडा तयार करणे गरजेचे असल्याचे यातून जाणवते. त्याचप्रमाणे अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करून प्रत्येक समाजाला न्याय मिळावा तसेच, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळासाठी 3500 कोटी रुपये भागभांडवलास मान्यता दिली आहे. मात्र, महामंडळाच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याखेरीज वंचित घटकांना त्याचा लाभ मिळणार नाही. याबाबत सरकारने दिरंगाई न करता संबंधित खात्यात रक्कम वर्ग करावी, यासह सरकारच्या उदासिनतेमुळे मातंग, मोची, होलार, चांभार, ढोर व धनगर समाज विकासापासून दूर आहे, त्यासाठी विकास आराखडा तयार करावा, अशीही आमची आग्रही मागणी असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.