Advertisement
मुंबई : 'आता आपल्या दोन तीन पातळीवर लढाई सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपण आता कमी पडणार नाही. कोर्टामध्ये आणखी एक सुनावणी होणार आहे. आता तिसरी लढाई ही कागदाची होणार आहे' असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात तिसऱ्या लढाईचे रणशिंग फुंकले. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. तर दुसरीकडे जळगावमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मातोश्रीवर जमा झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाहेर येऊन भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. 'आता आपल्या दोन तीन पातळीवर लढाई सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपण आता कमी पडणार नाही. कोर्टामध्ये आणखी एक सुनावणी होणार आहे. आता तिसरी लढाई ही कागदाची होणार आहे. शपथपत्र आणि सदस्यत्व आहे. ते कुठे ठेऊ नका' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'राजकारणामध्ये हारजीत होत असते. कधी कोण जिंकत असतं, कधी कुणी हारत असतं. पण राजकारणामध्ये कुणी कुणाला संपवण्याची भाषा कधी केली नाही. दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो आधी संपत असतो. जे नड्डा यांचे भाषण वाचले आहे. इतर पक्षांची घराणेशाही आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे. पण भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड आहेत. हायब्रीड आहेत.वंश विकत घेतायत, भाजप कोण आहे ? तर त्यांच्याकडे ३०-३० वर्ष दुसऱ्या पक्षात काम केलेले लोक आहेत. त्यांचे स्वताचे काहीच नाही. त्यामुळे त्यांच्याकडे राजकीय वंशच नाही विचारसरणी नाही.अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.
