Advertisement
मुंबई : राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनाआधी रणनिती ठरवण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, पण या बैठकीत काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. शिवसेनेकडून विधानपरिषदेत अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसने मात्र हे पद आपल्याला मिळावं, अशी मागणी केली होती. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला तर विधानपरिषदेत उपसभापतीपद शिवसेनेकडेआहे, त्यामुळे विधानपरिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं, यासाठी काँग्रेस आग्रही होती. विधानपरिषदेमध्ये शिवसेनेचे 12, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी 10-10 आमदार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी आपण विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडत असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांना दिला, पण आमदारकीच्या राजीनाम्याचं पत्र विधान परिषद उपसभापतींना दिलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.
