Advertisement
मुंबई : शिंदे गट आणि भाजपा सरकारमधील मित्रपक्ष आणि अपक्ष आमदार पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जागा न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अपक्ष आणि मित्रपक्षांना घ्यायला हवं होतं, असं बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी अनेक वेळा समाजकल्याण खातं मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अपंग आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला हे खातं हवं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांना अद्याप मंत्रीपदाची शपथ देण्यात आलेली नाही. ते म्हणाले की,“खरंतर अपक्ष आणि मित्रपक्षांनी मिळून हे सरकार बनलं आहे. आमची मागणी होती की पहिल्या टप्प्यात मित्रपक्ष आणि अपक्षांना घ्यायला हवं होतं. काही कारणं असू शकतात. ती समजून घेऊ. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की महिन्याभरात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा अपक्ष आणि मित्रपक्षाचा नक्की विचार केला जाईल.
