Advertisement
ठाणे : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा सगळ्यात मोठा फटका उद्धव ठाकरे यांना ठाण्यात बसला आहे. ठाणे जिल्ह्यातली शिवसेना एकनाथ शिंदे यांनी जवळपास आपल्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं आहे, यानंतर आता त्यांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं बोललं जात आहे, आणि आता घडामोडीही त्याच दिशेने व्हायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ठाणे जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे म्हात्रे यांनी त्यांचा राजीनामा ई-मेलद्वारे पाठवला आहे. म्हात्रे यांच्या राजीनाम्याने ठाणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मोठी हानी होणार आहे. आपण आपल्या वैयक्तिक कारणाने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
