#

Advertisement

Sunday, October 30, 2022, October 30, 2022 WIB
Last Updated 2022-10-30T10:33:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अडाणी मंडळी निघाली गुरूलाच शिकवायला : ऍड. कोमल ढोबळे-साळुंखे

Advertisement

मंगळवेढा : जिल्हा आणि तालुक्‍याच्या राजकारणात ढोबळे गटाची भूमिका निर्णायक आहे. मात्र, काही अडाणीच राहिलेली मंडळी सध्या गुरूलाच शिकवायला निघाली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संघटनेचे अस्तित्व काय आहे हे दाखवून देऊ, बहुजनांच्या संघटनेला कोणी चिल्लर समजण्याची चूक करू नये, असा सूचक इशारा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी दिला.
मंगळवेढा येथील शिशुविहार येथे बहुजन रयत परिषदेची विचार विनिमय बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, सिद्राम जावीर, राज्य सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, पश्चिम महाराष्ट्र भगवान गोरखे, सोलापूर शहराध्यक्ष अमित तांबे,डी.राज सर्वगौड, शिवाजी मोटे, सुदर्शन कसबे, दत्तात्रय पाटील, मल्हारी कांबळे, नितीन काळे, प्रकाश खंदारे, जनार्दन अवघडे, सुरेश कांबळे, विशाल खंदारे, विक्रम अवघडे आदी उपस्थित होते.
ऍड. साळुंखे म्हणाल्या की, बाबासाहेबांचे नाव सांगून आपण ज्या समाजातून पुढे येताना पाहतोय. त्याप्रमाणे आपण वागलो का? याचा विचार करण्याची गरज आहे. न्याय, समता, बंधुता यावर आधारित आपले संविधान सर्वोच्चस्थानी आहे. समाजासाठी काम करणारे हात अनेक आहेत. मात्र, त्या हाताला बळ देणारे हात मात्र कमी आहेत. सध्या तर काय तालुक्‍यातील राजकारण म्हणजे गुरूला शिकवण्याचा प्रयत्न काही अडाणीच राहिलेल्या शिष्यांकडून केला जात आहे. जगाच्या रंगमंचावर अशा पद्धतीने असावे की, आपली भुमिका संपल्यावरही लोकांनी टाळ्या वाजविल्या पाहिजेत, अशा पद्धतीचे काम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे, लोखंडाचा गंज हा त्याच्या नाशाचे कारण ठरतो त्यामुळे स्वतःमध्ये बदल केला पाहिजे.
राज्याच्या राजकारणातही बहुजन रयत परिषद संघटनेला महत्व आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे, संघटना काय काम करते हे शिकवण्याची गरज नाही, अशा पद्धतीने आपले अस्तित्व दाखवून द्यावे, असे आवाहन करताना संघटनेच्या पदाधिकाऱ्याला कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आहोतच, असा सूचक इशारा देखील ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी दिला.
यावेळी उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष तुकाराम गायकवाड, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख समाधान वाघमारे, तालुका कार्याध्यक्ष गोपाळ ऐवळे, तालुकाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष सुभाष भंडारे, तालुका सचिव गणपती राठोड, शहर उपाध्यक्ष तानाजी अवघडे आदींना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे, रमेश गालफाडे, ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या हस्ते नियुक्‍ती पत्र देण्यात आले.