Advertisement
सोलापूर : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्यातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज सांगोला तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांना केंद्र सरकारपेक्षा दुप्पट मदत केली जाईल, असे आश्वासन आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही दिले.
मागील आठ दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये संगेवाडी, मांजरी परिसरातील मका, डाळिंब, सूर्यफुल या पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहाणी आज आमदार पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे 10 गुंठे क्षेत्रसुद्धा मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं.
यासोबतच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, की पिकांना केंद्र सरकारच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करू. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, की उध्दव ठाकरे सांगोला दौऱ्यावर आल्यास आनंद होईल. मात्र, त्यांचे स्वागत त्यांचे कार्यकर्ते करतील. मी शिंदे साहेबांचे स्वागत करेन, असं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.
