Advertisement
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग एकनाथ शिंदे गटाला प्राधान्य देत आहे. शिंदे गट निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतरही कागदपत्रं देत नाही. मात्र, आम्ही दिलेली कागदपत्रं शिंदे गटाला दिली जातात. मात्र, त्यांची कागदपत्रे आम्हाला दिली जात नाही. आमची रणनीती तुम्ही उघड केली असा आरोप ठाकरे गटाने पत्रातून केला आहे.
आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? असा सवालही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
यासोबतच अंधेरी पोटनिवडणुपूर्वी शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवलं गेलं. दोन्ही पक्षांना नवं चिन्ह आणि नाव दिलं गेलं. यावरुनही प्रश्न उपस्थित करण्यात आला. जो पक्ष निवडणूक लढवीत नाही त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह रद्द केले जाते, असं म्हणत ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आमच्या ठाकरे गटाला सापत्य वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या पत्रामध्ये 12 मुद्दे मांडत ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात पक्षपातीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रातून आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षासोबत भेदभाव करीत आहे, असं यात म्हटलं गेलं आहे.
