Advertisement
नवी दिल्ली : आधी मुख्यमंत्रीपद गेलं, मग सरकार कोसळलं, आमदार-खासदार सोडून गेले आता तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही उद्धव ठाकरेंच्या हातातून गेलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
सगळं काही हातातून गेल्यानंतर आता ठाकरे गटाला पक्षनिधीही जायची भीती आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात हाच युक्तीवाद मांडला आहे. त्यांनी आधीच विधिमंडळातलं पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं आहे, आता ते बँक अकाऊंट आणि सगळं ताब्यात घेतील, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.
सुप्रीम कोर्टात सुनावणी
सुप्रीम कोर्टामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या सुनावणीवेळीही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या वतीने बैठक बोलवण्यात येईल आणि बैठकीला हजर राहिले नाही, म्हणून आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, असा संशय कपिल सिब्बल यांनी व्यक्त केला.
