Advertisement
बीड : तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या आहात तर या एमआयडीसीत एक मोठा प्रकल्प आणून दाखवा, असे खुलं आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिले आहे. परळी तालुक्यातील इंदपवाडी व जीरेवाडी येथे जलजीवन कामाचा भूमिपूजन कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.
धनंजय मुंडे म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे विकास कामे खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, विनाकारण यावरून टीका टिप्पण्या केल्या जात आहेत. मी एमआयडीसी आणली. पंकजा मुंडे यांच्या काळात पाच वेळा भूमिपूजन झालेल्या बायपासचे काम रखडले होते ते आपण अवघ्या दीड वर्षात पूर्ण केल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच जलजीवन मिशनच्या कामाचा संपूर्ण आराखडा आपण पालकमंत्री असल्याचा कार्यकाळात केल्याचे सांगून एमआयडी सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण मंजूर करून आणला आहे. निदान या एमआयडीसीच्या प्रकल्पात आपले वजन वापरून एखादा मोठा प्रकल्प आणून दाखवावा, असे आपले ओपन चॅलेंज असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
माझं सरकार नसताना पाच वेळी भूमिपूजन झालं. एका टोकाला, जिरेवाडी, टोकवाडीतून, मध्यंतरी एकदा अशी भूमिपूजनं झालीत. पण, काम झालं नाही. त्यावेळी आमदार झाल्यानंतर बायपास रद्द करावं लागलं. दुसरं टेंडर करावं लागलं. काम सुरू झाल्यापासून दीड वर्षाच्या आत हा बायपासचा रस्ता पूर्ण केला. बायपासच्या अगोदर आणि आता जमिनीचे भाव किती आहेत, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला. त्या जमिनीचे भाव चार कोटी रुपये एकर आहेत. विकास झाल्यानंतर जमिनीची किंमत वाढली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
