Advertisement
मुंबई : 'जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. मंत्री कशाला केलं जातंय ? महाराष्ट्र बघतोय, एक मंत्री उपस्थित नाही' असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार गैरहजर राहणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांवर चांगलेच संतापले. त्यांच्या या आक्षेपाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्री गैरहजर राहिल्याचे चित्र पाहण्यास मिळालं. त्यामुळे अजित पवार कमालीचे संतापले. मी सरकारच्या काळात मंत्री असताना सकाळी ९ वाजता सभागृहात उपस्थित राहत होतो. मात्र आज सकाळी ९:३० वाजता कामकाज सुरू झाले मात्र सभागृहात एक ही मंत्री उपस्थित नाही. किमान संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तरी उपस्थित राहायला हवं. यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. मंत्री कशाला केलं जातंय ? महाराष्ट्र बघतोय एक मंत्री उपस्थित नाही, अशा शब्दात अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
