Advertisement
नाशिक : जिल्ह्यातील माळवाडी गावच्या ग्रामस्थांमी गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. या गावात सुमारे 534 हेक्टरवर शेतकरी शेती व्यवसाय करत आहेत. या शेतात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी पिक म्हणून कांद्याचे पिक शेतकरी घेत आहेत. नगदी पिक म्हणून कांदा असल्याने गावातील 95 टक्के शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या तीन चार वर्षापासून शेतमालाला तुटपुंजा भाव मिळत असल्याने यातून शेतातील खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी गावात निराशेचा सूर होता. या संदर्भात शासनाला जाग यावी आणि समस्या सुटावी यासाठी सोमवारी (6 मार्च) माळवाडीतील शेतकऱ्यांनी बैठक बोलावली होती.
शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारा आवश्यक पैसा मिळत नाही. तसेच खासगी आणि सरकारी बँकेचे घेतलेले कर्ज सुद्धा फेडले जात नाही. त्यात शासन शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील नसल्याने शेतकऱ्यांनी गावच विकायचा निर्णय घेतला. सोमवारी यासाठी माळवाडी गावात बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ठरावावर सर्वांच्या सह्या देखील घेण्यात आल्या आहेत.
