Advertisement
बीड : नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागालँड सरकारला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे मोदी सरकारला ही शरद पवारांनी पाठिंबा देऊन एनडीएमध्ये यावे, असं आवाहन रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी बीडमध्ये केले. शरद पवार हे अनुभवी नेते आहे, याचा फायदा एनडीएला होईल. त्यामुळे शरद पवार यांनी युतीत यावे, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.
बीड आणि नंतर धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रामदास आठवले यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना चिमटा काढत त्यांना खुली ऑफर दिली आहे. नागालँड राज्यामध्ये एनडीएचे सरकार बहुमतात आले आहे. असे असताना पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गरज नसताना पाठिंबा दिला असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना चिमटा काढला. जसा नागालँडमध्ये पाठिंबा दिला तसा महाराष्ट्र राज्य व केंद्रात शरद पवारांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी आठवले यांनी केली आहे.
