Advertisement
मुंबई : महाविकास राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आहे. मात्र, सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा घणाघाती आरोप खासदार गजानन किर्तीकर यांनी केला आहे. तर, शिवसेना भाजपचं समन्वयाने काम सुरू असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर, शिवसेनाभाजप अनेक वर्षांचे मित्र आहेत, सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीला वर्ष बाकी आहे. एकीकडे महाविकास आघाडीत कोण किती जागा लढणार ते थेट मुख्यमंत्री कुणाचा या चर्चांना उधाण आलेलं असताना शिंदे-भाजपतही लोकसभेच्या जागांवरुन मागण्यांना जोर चढला आहे. लोकसभेला 22 जागाच हव्यात, 22 जागा आमच्या हक्काच्या अशी ठाम भूमिका शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी मांडली आहे. तर, आम्ही 22 जागा लढवण्याची तयारी करतोय असं खासदार राहुल शेवाळेंनीही स्पष्ट केले. तर, दीपक केसरकर यांनी सावध भूमिका घेतली आहे. तर, 22 जागा कुणाच्या यासंदर्भात शिंदे-फडणवीस आणि केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटल आहे. शिंदे गटाच्या 22 जागांच्या मागणीवर टीका करायची आयती संधी ठाकरे गटाला मिळाली आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत निश्चितता नाही. त्यात शिंदे गटानं लोकसभेसाठी 22 जागा हव्यातच अशी आग्रही भूमिका घेतलीय. जागावाटपाचा हा मुद्दा शिंदे-भाजपतील वादाचं कारण ठरु शकते.
