Advertisement
रायगड : मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने जागर पदयात्रा काढली आहे. पळस्पे ते मानगाव अशी 16 किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. पळस्पे फाट्यावरून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासोबत या पदयात्रेत सहभाग झाली आहेत. आठ टप्प्यात मनसे ही पदयात्रा काढत आहे. तर या पदयात्रेच्या समारोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
अमित ठाकरे यांनी जागर यात्रा सुरू होण्यापुर्वी शिव मंदिरात जात दर्शन घेतलं. अमित ठाकरे यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. वाशी टोल नाक्यावर फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. गजानन काळे आणि नवी मुंबईतील इतर मनसैनिकांनी अमित ठाकरेंचं स्वागत केलं.
अमित ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना या पदयात्रेविषयी माहिती दिली. गेला 17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे. निकृष्ट दर्जाचं हे काम होत आहे. हा आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आम्ही जागर यात्रा काढतोय. आज सगळ्यांना दिसेल की मनसेची ताकद किती आहे आणि कशा पद्धतीने आम्ही यात्रा काढतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून मनसेचे पदाधिकारी आले आहेत. इथल्या स्थानिक लोकांपर्यंत आम्ही हा मुद्दा पोहोचवणार आहोत, असं अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
