Advertisement
सिंधुदुर्ग : लोकसभेची निवडणूक पुढच्यावर्षी होणार आहे. त्यासाठी आतापासूनच सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. यात जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा ठरु शकतो. राज्यात सध्या महायुतीच सरकार आहे. ही महायुती एनडीएचा भाग आहे. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष आहेत. त्यांच्यात अजून जागा वाटपाची बोलणी सुरु झालेली नाही
पण महायुतीमधील पक्षांनी आतापासूनच काही जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण कसं वळण घेणार? याची उत्सुक्ता आहे. भारतीय जनता पार्टीचे कोकणातील नेते प्रमोद जठार यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडे ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. “सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असलेल्या लोकसभेच्या दोन जागा ठाणे आणि रत्नागिर-सिंधुदुर्ग भाजपाला मिळाव्यात अशी आग्रहाची मागणी आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात आम्ही ठाण मांडून काम करतोय. प्रत्येक बुथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे या दोन जागा भाजपाला सोडाव्यात” अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली आहे..