Advertisement
सांगली : खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते, असे माजी मंत्री तथा भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज अकस्मात निधन झाले, त्यांनी वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, त्याना ढोबळे यांनी या शब्दात श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे ढोबळे याही उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित संभाजीराव भिडे यांच्याशी ढोबळे यांनी काही आठवणी उलगडल्या.
सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी आमदार अनिल बाबर यांना न्यूमोनिया झाल्याने एडमिट करण्यात आले होते. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात ते प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात पोकळी निर्माण झाली आहे, असेही ढोबळे म्हणाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले.
