Advertisement
वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका !
मुंबई : बारामती दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. माझी शेवटची निवडणूक आहे, असं सांगितलं जाऊन भावनिक केलं जाईल, पण कधी शेवटची असणार काय माहित? असा टोला अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लगावला होता. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापले आहे. याच विधानावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली आहे.
आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का? अजितदादा... असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. त्यांचं हे वक्तव्य माणुसकीला शोभणारं तरी आहे का? याचा विचार त्यांनी स्वत: करावा, असंही आव्हाड म्हणतात. बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील. ते शरद पवार आहेत, त्यांचा शेवट नाही. ते महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर राहतील, असं म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर तोफ डागली. आधी आपली उंची बघावी आणि शरद पवार कुठे आहेत अन् तुम्ही कुठंय ते पाहावं. देशातील अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा मोठ्या व्यक्ती देखील शरद पवारांचं नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची... असं म्हणत आव्हाडांनी संताप व्यक्त केला. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
