Advertisement
नांदेड : संत बाळू मामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्याने तब्बल तीन हजारांहून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ही घटना आहे. कोष्टवाडी या गावात मंगळवारी बाळु मामांच्या मेंढ्या आल्या होत्या. त्या निमित्त संत बाळुमामा यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. रात्री आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा होता. काल एकादशी असल्यामुळे भाविकांना भगर हा महाप्रसाद ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी जवळपास 5 हजार भाविक इथे जमले होते. रात्री आरतीनंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. मंगळवारी एकादशी असल्याने प्रसादात भगर आणि शेंगदाणा कढी होती. भाविकांना भगर खाल्यानंतर अचानक उलटी, मळमळ, चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. या कार्यक्रमाला कोष्टवाडी या गावासह सावरगाव, हरणवाडी , पेंडु , सादलापुर या गावातील नागरिक आले होते. त्यांना देखील विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांचा समावेश अधिक आहे. भाविकांना त्रास व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना मिळेल त्या वाहनांनी रुग्णालयात पाठवण्यात आले.
