Advertisement
भाजप-मनसे युती जवळपास निश्चित?
मुंबई : मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी (6 फेब्रुवारी रोजी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर' बंगल्यावर भेट घेतली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजपाबरोबर युतीची चर्चा मनसे करत आहे का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं युतीच्या चर्चांना उधाण आल आहे.
कालच राज ठाकरेंनी दक्षिण मुंबई मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. सध्या मनसे कोणत्या जागांवर कोणते उमेदवार देता येतील याची चाचपणी केली जात आहे. मंगळवारी मनसेच्या नेत्यांनी फडणवीस यांच्याबरोबर 'सागर' बंगल्यावर जाऊन चर्चा केल्याच्या वृत्ताला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनीही दुजोरा दिला आहे.
भाजपा-मनसे जवळीक वाढली : एकनाथ शिंदेंच्या गटाने भाजपाबरोबर सत्ता स्थापन केल्यापासून राज ठाकरे आणि भाजपामधील जवळीक वाढली आहे. मागील काही महिन्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. अनेकदा राज आणि फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले आहे.
