Advertisement
केडगाव (दौंड) : मातंग समाज हा प्रामाणिक आहे. या समाजाने कधीही तह केले नाहीत. जे मिळेल ते गोड मानले. त्यामुळे समाजाचे नुकसान झाले. समाजाने संघटित होऊन निराधारांना मदत केली पाहिजे. उपेक्षितांना जगवणे, हे समाजाचे कर्तव्य आहे. एकीचे बळ वाढले पाहिजे. माजलेल्या व मस्तवाल हाल्याला वेसण घालायचे काम चळवळ करते, असे मत माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.
दौंडचे पहिले आमदार वि. रा. पवार यांच्या ११व्या स्मृतीदिनानिमित्त दौंड तालुक्यातील (पुणे जिल्हा) चौफुला येथे मातंग एकीकरण समिती व दौंड सकल मातंग समिती यांच्या वतीने मातंग मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी प्रा. ढोबळे बोलत होते.
मातंग एकीकरण समितीचे अध्यक्ष सुरेश वाघमारे हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सावित्रीबाई पवार, विलास अडगळे, केशव पवार, प्रा. सुहास नाईक, म्हस्कू शेंडगे, दत्ता डाडर, शहाजी जाधव, लक्ष्मण मांढरे, राजेश नेटके, नीलेश नेटके, राहुल वळू, संजय अढागळे, श्रीकांत पवार आदी उपस्थित होते.
यावेळी समाजातील गुणवंतांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. ढोबळे म्हणाले की, वि. रा. पवार हे अत्यंत कष्टाने जीवन जगले. अत्याचाराला निकराने प्रतिकार केला नाही म्हणून अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे समाज अडचणीत आला. समाजाचा हिताचा टक्का वाढवायला आपण कमी पडलो, त्यात मीसुद्धा आहे. आपण आक्रमक नसल्याने सर्वांनी आपल्याला गृहीत धरले. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
बोरीपार्थी येथील दिवंगत आमदार वि. रा. पवार यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना त्यांना समाजाचे काम केले. ते त्यांच्याच समाजाला कळले नाही, याची खंत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. समाजाने संघटित होण्याची गरज आहे.
- सुरेश वाघमारे, अध्यक्ष, मातंग एकीकरण समिती
