Advertisement
राज ठाकरेंनी थेट सांगितला जागांचा आकडा
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकला चलो रेची भूमिका घेतली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना आपण 200 ते 250 जागांसाठी तयारीला लागलं पाहिजे असं म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे पदाधिकारी बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केल्याची माहिती समोर येत असून राज ठाकरेंनी आपण कोणत्याही पक्षाकडे जागा मागण्यासाठी तसेच जागावाटपाची चर्चा करण्यासाठी जाणार नसल्याचे संकेत दिल्याचे समजते.
...म्हणून स्वबळाचा नारा?
राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. राज यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या. मात्र आता जागा वाटपामध्ये राज यांच्या वाट्याला कमी जागा येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सत्तेत असलेल्या भाजपाचे 105 आमदार आहेत. शिंदे गटाचे 40 तर अजित पवार गटाचेही तितकेच आमदार असल्याने जागा वाटपामध्ये राज ठाकरेंच्या वाट्याला फारच कमी जागा येतील असा अंदाज बांदला जात असल्याने राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मार्ग चाचपडून पाहत असल्याचे समजते.
