Advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी तसेच एकनाथ शिंदेंच्या गटातील उमेदवार पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच आता महायुतीमध्ये दोन पक्षांना एकत्रितपणे बहुमत असताना तिसऱ्या पक्षाच्या गरजेसंदर्भात महायुतीमधील इतर दोन पक्षांतील नेतेच प्रश्न उपस्थित करु लागले आहेत. महायुतीमधील भाजपा आणि शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना अजित पवार युतीत नकोसे झाल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या पक्षाची मतं भाजपा तसेच शिंदे गटाला ट्रान्सफर न झाल्याने ही नाराजी व्यक्त केली जात आहे. अजित पवारांची महायुतीत गरज काय यासंदर्भात आता भाजपामधील काही नेत्यांनी दबाव आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहिल्यास अजित पवार गटाचे आमदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा तसेच शिंदे गटाचे उमेदवार पिछाडीवर राहिल्याने महायुतीला फटका बसल्याचं दिसत आहे. बरं असे एक दोन मतदारसंघ नसून अनेक मतदारसंघ आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर, माढा, मावळ, दिंडोरी मतदारसंघांचा समावेश आहे.
अजित पवार गटाने आपल्याला सहकार्य केलं नाही !
मावळमधून जिंकलेले शिंदेंच्या गटाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटाने आपल्याला सहकार्य केलं नाही अशी नाराजी उघडपणे यापूर्वीच व्यक्त केली आहे. असाच अनुभव इतरांचाही असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीचा विचार करता अजित पवारांना महायुतीबरोबर ठेवावे की नाही याचा फेरविचार पक्षनेतृत्वाने करावा यासाठी भाजपा आणि शिंदे गटातील प्रभावशाली नेते नेतृत्वावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे.
