Advertisement
शासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मानवतेचा काउंंटर’ सुरू करण्याची विनंती
पुणे : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अन्नधान्यासह कपडे, मुलांचे शालेय साहित्य भिजले आहे. घरांची दुरवस्था झाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने जनजीवन पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे. यामुळेच सामाजिक संस्था, संघटना यांच्यासह समजातील दानशुरांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सामाजिक बांधलकीतून मदतीचा हात द्यावा, यासाठी शासनाने तातडीनने ‘मानवतेचा काउंंटर’ शासकीय कार्यालयांत सुरू करावा. हा काउंंटर जाहिरात प्रतिबंधित असण्याची अट असावी म्हणजे मदत देणार्यांचे फोटो अथवा व्हिडीओ काढण्यास सक्त मनाई असावी, जेणेकरून समाजातील दानशूर व्यक्ती मदत करण्यास आणि पूरग्रस्तही मदत स्विकारण्यास पुढे येतील, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी पत्र/निवेदनाद्वारे केली आहे.
बहुजन रयत परिषदेच्या संवाद दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा राज्यभरात दौरा सुरू होता. यावेळी काही पूरग्रस्त जिल्ह्यांतील स्थिती त्यांनी पाहिली. त्यानुसार काही ठिकाणी कार्यकर्त्यांना मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यापार्श्वभूमीवर सर्व मुद्दे बाजुला ठेऊन अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सध्याची राज्यातील गंभीर पूरस्थिती लक्षात घेता शासकीय पातळीवर वेगवान हालचाली होण्याबाबची अपेक्षा व्यक्त करीत पुरग्रस्तांना तातडीनने सर्व प्रकारची मदत मिळण्यााकरिता शासनाने ‘मानवतेचा काउंंटर’ शासकीय कार्यालयांत सुरू करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या, सर्वत्र राजकीय दृष्टीनेच अनेक जण कार्यरत आहेत त्यामुळे ‘मानवतेचा काउंंटर’चा उपयोग कोणी राजकीय जाहिरांतीसाठी करू नये, यासाठी फोटो, व्हिडीओ मनाई असावी, असेही अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे सूचित केले आहे.
याबाबत अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रसारमाध्यमांनी शासनाच्या माध्यमातून इनिशिएटिव्ह घेऊन काम केल्यास मदतीचा ओघ नक्की वाढेल. यासाठी पत्रकार बांधवांनी आपल्या वृत्तपत्रातून नागरिकांना आवाहन करावे, असे केल्यास गरजेच्या वस्तू पूरग्रस्तांना तातडीने पोहोचविणे शक्य होईल. अनेक लोक मदत करतानाचे व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर टाकतात. परंतु, घरात पाणी शिरल्यामुळे फक्त खाण्याचे पदार्थच नाही तर अंथरूण, पांघरूण, कपडे, औषधे, सॅनिटरी पॅड, शालेय साहित्य अशा अनेक गोष्टींचे नुकसान झालेले असते. बर्याचदा फक्त खाद्यपदार्थांची मदतच जास्त केली जाते. त्यामुळे अन्नाची नासाडी होते. इतर जीवनावश्यक वस्तूदेखील पूरग्रस्तांना मिळणे आवश्यक आहे. यासाठी ‘मानवतेचा काउंंटर’ शासनाचा अधिकृत काउंंटर पूरग्रस्त भागात तातडीने सुरू करणे गरजेचे वाटते, असे पत्र/निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देण्यात आले आहे.
