Advertisement
मुंबई : उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा (Love Jihad) आरोप कऱणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं नाही अशा शब्दांत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही धर्माचा, जातीचा असला तरी तात्काळ शिक्षा झाली पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांना तुमची दहशत दाखवा असं आवाहनही केलं.
काहीजण लव्ह जिहादचा आरोप करत असल्याबद्दल विचारलं असता शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, याच्यात धर्म आणू नका, आपल्या हिंदू पुजाऱ्यानेही केलं आहे. दुसरी केस मंदिरात घडली असून अती लाजिरवाणी आहे. हे काम करणाऱ्या पुरुषांना धर्म नसतो. कोणत्याही धर्माचा, जातीचा असला तरी तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं नाही. त्यालाही तितकीच कडक शिक्षा झाली पाहिजे.
पोलिसांची दहशत असली पाहिजे. पोलीस काय करतात हे कळल्याशिवाय हे असले पुरुष थांबणार नाहीत, शक्ती कायदा 10 वर्षांपासून अंमलात आणलेला नाही. तो बासनात गुंडाळून ठेवला आहे. तो एका वर्षात संमत करावा अशी आमची पंतप्रधानांकडे मागणी आहे. असा गुन्हा झाल्यास 2 महिन्यात त्याला फाशीच दिली पाहिजे. हायकोर्टातून सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती असा वाव नसावा. त्यांना न्याय मिळता कामा नये.
