Advertisement
पुणे: शिवसेना खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. परंतु, या निवडणुकीत शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घरवापसी करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
शिवाजीराव पाटील यांनी शिरूर येथे आखाड पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर आणि हवेली तालुका शिवसेनेचे अध्यक्ष विपुल शितोळे हे देखील या पार्टीला उपस्थित होते. या नेत्यांनी आढळराव पाटील यांना पुन्हा स्वगृही परतण्याची विनंती केली. त्यांच्या या मागणीला शिवसैनिकांनी प्रतिसाद दिला. शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयाचा फायदा झाला नाही. उलट तोटाच झाला अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून आढळराव पाटील भावूक झाले होते. त्यामुळे ते घरवापसी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, महायुतीच्या जागावाटपात शिरुरची जागा अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 26 मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण, 2024 च्या निवडणुकीत शिवाजी आढळराव पाटील यांना पुन्हा पराभवाचा धक्का बसला.
