Advertisement
भाजपच्या वरिष्ठ नेत्याने केले स्पष्ट
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली. भाजपने जास्त जागा जिंकल्या तर भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करेल असे भाजप नेत्याने स्पष्ट केले. तर, दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे शिवसेनेने कितीही जागा जिंकल्या तरी शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असे शिवसेनेने म्हटले आहे.
विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी ( अजितदादा) या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 100 जागांवर दावा सांगितला आहे. मात्र, हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 80-80 जागांवर तडजोड करतील. तर, भाजप 160 जागा लढविणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय नवी दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे असेही या भाजप नेत्याने सांगितले.
भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुक झाल्या. त्यावेळी भाजपने कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले नाही. हीच प्रक्रिया महाराष्ट्रात स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे. बराच विचारविनिमय केल्यानंतर महायुतीच्या एकाही नेत्याला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाही, असा निर्णय घेतला आहे असे या नेत्याने सांगितले.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल. जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत पक्ष किमान 160 जागांवर दावा करणार आहे. चर्चेदरम्यान या संख्येवर आम्ही भर देऊ. भाजप 100 हून अधिक जागा जिंकेल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्रीपदावर दावा सांगू अशी माहितीही या नेत्याने दिली.
