Advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात आता अभूतपूर्व घडामोडी घडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड अपयश आलं. या निवडणुकीत मोदी लाट पूर्णपणे फेल गेल्याने छोट्या छोट्या राजकीय पक्षांचं बळ वाढलं आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार आहे. ही तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेतला आहे. अनेक छोट्या पण ताकदवान पक्षांना सोबत घेऊन रविकांत तुपकर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करणार आहेत.
रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इतर कोणत्याही राजकीय पक्षाची ऑफर आल्यावर आम्ही कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्याचा निर्णय घेऊ, असं सांगतानाच बच्चू कडू यांच्याशी काल भेट झाली. आम्ही तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहोत. या तिसऱ्या आघाडीत येण्यास बच्चू कडू यांनी होकार दिला आहे. पण जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही कार्यकर्त्यांना विचारूनच घेऊ, असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
