Advertisement
रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
मुंबई : ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीत घडलेल्या दगडफेकीच्या घटनेवर भाष्य करताना आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती तेव्हा मनोज जरांगे पाटील तिथून निघून गेला होता, त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार केला. त्यानंतर रात्री दोन वाजता रोहित पवार आणि स्थानिक आमदार राजेश टोपे हे अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी आले आणि त्यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा त्याठिकाणी बसवले, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. आता, भुजबळ यांच्या दाव्यावर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.
सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्यासारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का?, असा सवाल रोहित पवार यांनी दिला आहे. तसेच, आपण मध्यरात्री 2.30 वाजता तेथे गेलो होतो, असेही रोहित पवारानी मान्य केले.
