Advertisement
बारामती : लोकसभा निवडणुकांवेळी पवार विरुद्ध सुळे असा राजकीय सामना रंगला होता. मात्र, तो सामना पवार विरुद्ध पवार असा काका विरुद्ध पुतण्या असाच होता. आता, बारामती विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. कारण युगेंद्र पवार उद्यापासून बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा काढत आहेत. यात्रेच्या निमित्ताने गावागावात युगेंद्र पवार जाऊन शरद पवार यांची भूमिका लोकांना समजून सांगणार आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर युगेंद्र पवार आता मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.
साधारण 10 दिवसांचा हा दौरा असून मतदारसंघातील सर्वच गावांत गाठीभेटी देऊन लोकांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून करणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. यावेळी, अजित पवारांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी उत्तर देणं टाळलं. सुशिक्षीत बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, मागच्या 20 ते 25 वर्षात लोकसंख्या आणि बेरोजगारी खूप वाढली आहे. या प्रश्नावर आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच, पाण्याचा प्रश्नही बारामती तालुक्यात महत्त्वाचा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं.
