Advertisement
बीड : बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर जास्त आनंद झाला असता, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, मला जालना येथील पालकमंत्रिपद मिळालं आहे. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव असं समजून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सारखं काम करायला मिळेल असं नाही.
मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती. याचा मला अधिक आनंद झाला असता. माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिला आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.जालन्याचं पालकमंत्रिपद मिळालं या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शवता मिळालेल्या संधीत जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहे ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
