Advertisement
सोलापूर : केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच केली, शहा यांच्या या वक्त्यावर शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ढोबळे यांनी दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्येच नव्हे तर संपर्णू देशातील शेतकऱ्यांमध्ये पवार साहेबांबद्दल आदराचे स्थान आहे. त्यांच्यावर टीका करून त्यांची प्रतिमा ठिसूळ करण्याचे काम केले जाते, आजपर्यंत असा प्रयत्न अनेकांनी केला. परंतु, ते कोणला जमलेले नाही. उरला प्रश्न पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले याचा, देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सर्वात प्रथम शरद पवार यांनी दिली. देशाचा सर्वात यशस्वी कृषि मंत्री कोण, असे कोणी विचारले तर शरद पवार यांचे नाव घेतले जाते. आधारभूत किंमत वाढविण्याचे काम पवार साहेबांच्या नेतृत्वातील कृषी खात्याने केले. केरळमधील नारळ आणि सुपारी पासून देशातील सर्व पिकांना पवार यांनी आधारभूत किंमत पवार साहेबांनी मिळवून दिली आहे. साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्स लादले जाणार होते, हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये शरद पवार यांनी थांबवले अन्यथा आज सहकारी साखर कारखानेच नेस्तनाबूत झाले असते. कृषिमंत्री म्हणूनच पवार साहेब यांच्याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रचंड सहानभूती आहे, याच कारणामुळे कोणी आले की त्यांच्यावर टीका करून मोठे होण्याचा प्रयत्न करतो. पवार साहेब यांच्यावर आजपर्यंत ज्या-ज्या वेळी टीका झाली त्या-त्या वेळी महाराष्ट्रातील जनता पवार साहेब यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीतने उभी राहिली आहे, असेही लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्पष्ट केले.
