Advertisement
मुंबई : आम आदमी पक्षाच्या पराभवाला इंडिया आघाडीतील नेत्यांचा इगो जबाबदार असल्याचे मत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी मांडले आहे.
रोहीत पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! 15 हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती, असे ते म्हणाले.
दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती,असे रोहीत पवार म्हणाले. परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, असे म्हणत त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना स्पष्ट शब्दात सुनावले. परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
