Advertisement
SRPF ची तुकडी करणार कबरीचे संरक्षण
छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. औरंगजेब याची कबर हटवली नाही तर पूर्ण महारष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचे बजरंग दलाने म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापले आहे. बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. त्या ठिकाणी आता SRPF ची तुकडी तैनात केली आहे. त्यात 15 पोलीस कर्मचारी असणार आहे. तसेच दोन पोलीस अधिकारी कबरीचे संरक्षण करणार आहे. मिलिंद एकबोटे यांना 5 एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येण्यास बंदी करण्यात आली आहे.
रोहित पवार यांची वेगळी भूमिका
औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण चांगल तापले आहे, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, 27 वर्ष औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आले नाही. त्याच प्रतीक म्हणून औरंगजेबाची कबर आहे. ही कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील. त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
