Advertisement
अहिल्यानगर येथे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण अंमलबजावणी होण्यासाठी बहुजन परिषदेच्या वतीने अहिल्यानगर येथे उपवर्गीकरण परिषद पार पडली. मुंबई येथे ता. २० मे रोजी होणाऱ्या उपवर्गीकरण मोर्चासंदर्भात समाज जागृती करण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्यावतीने उपवर्गीकरण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई ढोबळे साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मंबई येथे मोर्चाला येताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात ॲड. राम चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. उपवर्गीकरण हक्क परिषदेची आवश्यकता का आहे, दुर्लक्षित झालेल्या इतर समाजाला आरक्षण का व कसे मिळावे, यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन मारुती वाडेकर यांनी केले. त्याचप्रमाणे वर्गीकरणांमध्ये मातंग समाजास किती टक्के आरक्षण मिळावे, यासंदर्भात ॲड. कोमलताई साळुंखे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी मिळालेल्या हक्कांचे कशा प्रकारे समाज सुधारण्यासाठी किंवा प्रबोधनासाठी वापर केला पाहिजे, समाजाने आपली प्रगती कशी केली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.
सदर उपवर्गीकरण हक्क परिषदेचे आयोजन बहुजन परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. ना. म. साठे, तसेच अहिल्यानगर मातंग समाजांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी बहुजन रयत परिषदेचे इंजिनियर विलास सूर्यवंशी तसेच रवि कनगरे आदींनी परिश्रम घेतले. उपवर्गीकरण हक्क परिषदेस बहुजन रयत परिषदेचे दक्षिण व उत्तर अहिल्यानगर अध्यक्ष उपाध्यक्ष, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. राहुल जाधव यांनी केले. प्रास्ताविक साठे सर यांनी केले. परिषदेत नाशिक विभागाचे साहेबराव शृंगार, रवींद्र पाटील, अनिल बावीस्कर, धनंजय जाधव, महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अहिल्यानगरचे पुरस्कार प्राप्त नामदेवराव चांदणे, सखुबाई बोरगे बाबासाहेब साठे, संतोष साळवे, संदीप पवार, सत्यवान नवगिरे, ॲक्टिव्ह मराठी मुख्य संपादक उमेश साठे, बापू गायकवाड, संजय भिसे, विजय वडागळे व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
