Advertisement
मुंबई : राज्यात मागच्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर लगेच त्यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे अडचणीत सापडले. बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर आणि इतर विविध कारणांमुळे वादात सापडलेल्या धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच आठ दिवसापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली.
धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिकच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आठ दिवसापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली ही घटना घडताच धनंजय मुंडे यांनी तातडीने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे असलेले विपश्यना केंद्र गाठले. आठ दिवसापासून ते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. सलग दहा दिवस त्यांचा हा कार्यक्रम असल्याचे समजते त्यापैकी आठ दिवस पूर्ण झाले असून ते आपली धारणा साधना पूर्ण करून दोन तारखेला पुन्हा कामाला लागणार असल्याचे त्यांचे कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. वेगवेगळे वाद, आरोप, शपथविधी राजीनामा अशा वेगवेगळ्या घटनांमुळे धनंजय मुंडे हे मागील सहा महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. ते काही दिवसांपूर्वी उपचारासाठी विदेशात गेल्याची ही माहिती आली होती. आता विपशनेनंतर नवीन धनंजय मुंडे पाहायला मिळतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
