Advertisement
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणला भारत-नेपाळच्या सीमेवरुन अटक केल्यानंतर तो पोलिसांना कसा सापडला याची रंजक माहिती समोर आली आहे. गुन्हेगारी वृत्ती असल्याने निलेशने पोलिसांना सुगावा लागू नये यासाठी पळून जाताना सोबत लाखो रुपये घेऊन गेला. कोणताही व्यवहार ऑनलाइन पद्धतीने न करता तो कॅशचा वापर करत होता.
पुणे सोडताना निलेशने त्याच्या एका घटस्फोटीत मैत्रिणीला फिरायला जाऊ असं खोटं सांगत सोबत नेलं होतं. ही मैत्रीणही विश्वासाने त्याच्याबरोबर पुण्याहून मुंबई आणि नंतर कर्जत, रायगडमार्गे अगदी दिल्लीपर्यंत गेली. दिल्लीला पोहोचल्यावर निलेशने या मैत्रिणीच्या फोनवरून त्याच्या एका व्यक्तीला फोन केला. या व्यक्तीवर पिंपरी चिंचवड पोलिसांची आधीपासूनच नजर होती. पोलिसांना या व्यक्तीला आलेल्या फोनची माहिती मिळताच त्यांना निलेशच्या मैत्रिणीचे लोकेशन दिल्लीत असल्याचं समजलं आणि तिथूनच पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली.
दिल्लीतून निलेश गोरखपुरला गेला आणि त्याची घटस्फोटीत मैत्रीण पुण्याला आली. ती पुण्यात परतताच पोलिसांनी तिची चौकशी केली आणि पोलिसांना निलेशच्या ठावठिकाण्याचा पहिला सुगावा मिळाला. त्याच्या अटकेसाठी हाच क्लू अत्यंत महत्त्वाचा ठरला.निलेश गोरखपूरला याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या भोवतीचा फास आवळला आणि अखेर नेपाळ बॉर्डरवरून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती निलेशच्या अटकेच्या दिवशी पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.
