Advertisement
मुंबई महानगरपालिका इलेक्शन गाजणार
मुंबई : राज्यातील एका मोठ्या पक्षात साधारण 19 वर्षांपूर्वी भूकंप आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं. हा भूकंप होता बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपासून राज ठाकरे यांनी वेगळी वाट निवडण्याचा. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून दुरावा पत्करला आणि तेव्हापासून आतापर्यंत मतांचं गणितही विभागलं गेलं. मुंबई महानगरपालिकेवर एकिकडे ठाकरेंचाच आवाज असताना दरम्यानच्या काळात आलेल्या राजकीय वादळामुळं पालिकेवर असणाऱ्या ठाकरेंच्या वर्चस्वाला तडा गेला. या वादळानं ठाकरेंच्या पक्षाचं मूळ नाव, चिन्हं हिरावलं गेलं. मात्र तरीही उद्धव ठाकरे आणि पक्षातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर या संकटालाही नेत्यांनी तोंड दिलं.
आता मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं स्वैर असतानाच ठाकरेंची ताकद वाढताना दिसत असून, यास कारण ठरत आहे ती म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे या दोघांच्याही युतीची चर्चा. महाराष्ट्राच्या मनात जे आहेत तेच होईल असं म्हणत जणू उद्धव ठाकरेंनी या चर्चांना आणखीनच वाव दिला. तिथं आदित्य आणि अमित ठाकरे या दोघांनीसुद्धा युतीसाठी आपण अनुकूल असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आणि पालिका निवडणुकीआधी मनसे- UBT शिवसेना एकत्र आल्यास BMC वर ठाकरेंचाच आवाज असणार ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
महायुतीसाठी असणार मोठी आव्हानं
प्रत्यक्षात मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा ठाकरेंची शिवसेना सुरुवातीपासूनच उजवी होती. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मनोमिलन झाल्यास आणि त्यांची राजकीय मतं जुळल्यास पाकिकेतून ठाकरेंच्या शिवसेनेला हद्दपार करणं महायुतीला आव्हानात्मक ठरणार आहे. मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत असणारी पकडही या निवडणुकीतून स्पष्ट होणार असून, निवडणुकीसाठी प्रत्यक्षात महायुतीचंच कौशल्य पणाला लागणार आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
